जळगाव जामोद, शाखेचा विजयादशमी उत्सव व लक्षवेधक पथसंचलन

मागील शंभर वर्षांपासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखा सुसंस्कारातून आदर्श व्यक्तीनिर्माणाचा कार्याकरिता समर्पित असून समाजसेवेसोबत आदर्श व सुसंस्कारी पिढी घडवण्याचे कार्य संघ करीत आहे असे मौल्यवान मार्गदर्शन दि.११ ऑक्टोबरला शहरातील श्रीपाद कृष्ण कोल्हटकर महाविद्यालयात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख वक्ते श्रीधरराव गाडगे प्रांत सहसंघचालक यांनी केले. जळगांव जामोद शाखेच्या विजयादशमी उत्सव व पथसंंचालन या कार्यक्रमाचे आयोजन शहरातील श्रीपाद कृष्ण कोल्हटकर महाविद्यालयात दि.११ ऑक्टोबरच्या संध्याकाळी केले होते. या कार्यक्रमाला व्यासपीठावर प्रमुख वक्ते म्हणून श्रीधरराव गाडगे प्रांत सहसंघचालक. तर प्रमुख अतिथी म्हणून भेंडवळ मांडणीचे प्रणेते चंद्रभान महाराज यांचे वंशज पुंजाजी महाराज वाघ, एडवोकेट गिरीश माळपांडे तालुका संघचालक व मिलिंद जोशी नगर संघचालक यांची प्रमुख उपस्थिती होती.

मार्गदर्शनपर कार्यक्रमापूर्वी शहराच्या प्रमुख मार्गांवरून अभूतपूर्व शिस्तबद्ध राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांचे पथसंचलन काढण्यात आले. यावेळी शहरातील संघप्रेमी नागरिकांनी घरासमोर रांगोळींची आरास, जेसीबी व घरासमोरून पुष्पवृष्टी तसेच स्वागत कमानी उभारून स्वयंसेवकांचे स्वागत केले. पथसंंचालनानंतर मार्गदर्शनपर कार्यक्रमाला श्रीपाद कृष्ण कोल्हटकर महाविद्यालयात सुरुवात झाली. उत्सवाचे प्रास्ताविक अनिल भन्साली नगर कार्यवाह यांनी केले, त्यांनी प्रास्ताविकातून संघ कार्याची माहिती दिली. प्रमुख अतिथी भेंडवळ मांडणीचे प्रणेते चंद्रभान महाराज यांचे वंशज पुंजाजी महाराज वाघ यांनी त्यांच्या मार्गदर्शनात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून होत असलेले सेवाकार्य तसेच पिढी घडविण्याचे कार्य संघ करीत असल्याचे सांगितले.

प्रमुख वक्ते श्रीधरराव गाडगे प्रांत सहसंघचालक यांनी त्यांच्या मार्गदर्शनातून दुबळ्या झालेल्या हिंदू समाजाला संघटित करण्यासाठी १०० वर्षांपूर्वी संघाची स्थापना डॉक्टर हेडगेवार यांनी केली व त्या माध्यमातून आज मोठे संघटन झाल्याचे सांगितले. संघ कोणाचा विरोधक नाही व संघ सतत राष्ट्र निर्माणाचे कार्य करीत आहे. भारतीय सनातन संस्कृती जपण्याचे कार्य संघाने केले असून या सनातन संस्कृतीमुळे जगात आक्रमण करणाऱ्यांना युरोप व इतर भागातील संस्कृती संपवता आल्या मात्र सनातन विचारधारेमुळे आपला समाज टिकून राहिला आहे. भारताने कधीच कोणत्या राष्ट्रावर आक्रमण केले नाही आपण नेहमी जगात ज्ञानाचा, विश्व कल्याणचा व विश्वशांतीचा प्रसार केला आहे. शक्ती, ज्ञान व समृद्धी या तिन्ही शक्तींची आराधना संघ शतकापासून करीत आला आहे. संघ शंभर वर्षापासून समरसता समाजात प्रस्थापित करण्याचे महान कार्य करीत आहे. मात्र आजही आपल्याला विषमता दिसून येते. त्यामुळे प्रत्येकाने समरसतेचा मंत्र अंगीकारला पाहिजे. आपली आदर्श कुटुंब पद्धती, आपली मातृभाषा आपली वेशभूषा व आपले पर्यावरण जपण्याचे कार्य प्रत्येक नागरिकांनी करावे असे आवाहन त्यांनी केले. या कार्यक्रमाला परिसरातील संत, महंत, संघप्रेमी महिला पुरुष व स्वयंसेवक यांची उपस्थिती लक्षवेध होती.